भीमा नदीकाठच्या शेतीपंपांना सलग ८ तास वीज द्या; आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आग्रही मागणी
पावसाअभावी पिके धोक्यात; भीमा नदीतील पाण्याचा लाभ मिळावा म्हणून ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सलग ८ तास वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघा तील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेती पंपासाठी सलग ८ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.पाऊस कमी झाल्याने पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली असून भीमा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असतानाही अपुऱ्या वीजपुरवठ्या मुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत असून वीर धरणातूनही भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी पुढे कर्नाटक राज्यात वाहून जात असताना भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक वीज मिळत नसल्याने ते या पाण्याचा उपयोग करू शकत नाहीत.
सध्या भीमा नदीकाठच्या अनेक भागात शेतीपंपांना केवळ दोन ते पाच तासच वीजपुरवठा होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसून पावसाअभावी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत.नदीतून वाहून जाणारे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी उपयोगात आणण्यासाठी शेतीपंपांना किमान आठ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी म्हटले आहे. यासाठी संबंधित विभागांना तातडीने आवश्यक आदेश देऊन भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या मागणीमुळे पाणी उपलब्ध झाले तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नदीकाठच्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











Add Comment