पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन संतांनी पर्यावरण पूरक जीवनाचा संदेश दिला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१६ वर्षांपासून किर्तन,भारूड, पोवाड्याद्वारे पर्यावरण जनजागृती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा समारोप
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ जुलै २०२६ :- राज्यात शेकडो वर्षापासून संतांनी आपल्या विचारातून समाज प्रबोधन केले. सर्व संतानी पर्यावरणाचे महत्व सांगून पर्यावरण पूरक जीवनाचा संदेश दिला आहे.हाच संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमातून केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पर्यावरण विभागाचा हा उपक्रम खूप चांगला असून प्राचीन काळापासून आलेले वैष्णवांचे हे विचार गावोगावी जाऊन पोहोचविण्यात येत आहेत.सध्या जगासमोरील सर्वात मोठा प्रश्न हा पर्यावरणाचा आहे.हा प्रश्न कोणतीही एक व्यक्ती सोडवू शकत नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करू या, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमात संजय महाराज पाचपोर यांनी कीर्तनातून, संध्याताई साकी यांनी भारुड तर शाहीर माळी यांनी पोवड्यातून पर्यावरण जागृतीचे महत्त्वपूर्ण काम केले असून या वारीतही ते चांगले काम करत आहेत व ते पुढे ही असेच सुरू ठेवावे असे सांगून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कीर्तन, भारुड ज्ञान जात असल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.
प्रदूषण मंडळाचे सचिव राहुल रेखावर म्हणाले, प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण थांबविण्यासाठी १९७० पासून प्रयत्न करत आहे. सन २०१० पासून पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवत आहे. राज्यात एक लाख ३४ हजार उद्योग कार्यरत असून या उद्योगावर प्रदूषण होऊ नये म्हणून नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहे तसेच उद्योगाकडून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर नियंत्रण ठेवत असून प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे,असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पर्यावरण जागृतीचा संदेश देणारे किर्तन,भारुड व पोवाडा चे सादरीकरण मुख्यमंत्री यांच्यासमोर करण्यात आले. त्यानंतर पावलीचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी फुगडी खेळली. त्यानंतर सौ.फडणवीस यांनी महिला कलाकारांच्या समवेतही फुगडी खेळली.मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनीही हरी नामाच्या गजरात फुगडी खेळली. यावेळी मुख्यमंत्री महोदय व सर्व उपस्थित यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत पावली केली.
शासकीय विश्रामगृह येथे बाल वारकरी यांनी ज्ञानोबा राया तुकोबा राया म्हणत मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीसही बाल वारकऱ्यांसोबत भजनात दंग झाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात बेल वृक्षाचे रोपण करण्यात आले.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त जत विधानसभा मतदार संघास कार्डियाक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. सदर कर्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री यांच्या हस्ते आदेश वितरण
सोलापूर शहरातील उड्डाणपुलासाठी ५.६६ हेक्टर जागा सोलापूर महापालिकाकडे हस्तांतरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा आदेश महापौर विनायक कोंड्याल,आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी स्वीकारले. तसेच तरुण भारत संवाद या वृत्तपत्राच्या वारीवरील विशेषांकाचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार विजयकुमार देशमुख,आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावर, विभागीय आयुक्त शितल तेली- उगले,जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आदी उपस्थित होते.
संतांनी पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला,पंढरपुरातील पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी समारोपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन.आषाढी वारी 2026: पर्यावरण जनजागृतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संदेश; पंढरपुरात ‘पर्यावरणाची वारी’ उपक्रमाचा उत्साहात समारोप
पंढरपूर आषाढी वारी 2026 निमित्त ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले. कीर्तन, भारूड, पोवाडा, वृक्षारोपण, बाल वारकरी स्वागत आणि विविध विकासकामांच्या उद्घाटनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.











Add Comment