आषाढी वारी 2026: वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी 342 अधिकारी, 3,528 पोलीस अंमलदार तैनात; पंढरपूर पोलीस सज्ज
पंढरपूर वारीत अभेद्य सुरक्षा!46 वॉच टॉवर,352 CCTV, 13 पोलीस मदत केंद्रे आणि 16 आपत्कालीन पथके सज्ज – सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21: आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून या आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.

आषाढी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 342 अधिकारी व 3528 अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.यामध्ये एक पोलीस अधिक्षक,चार अप्पर पोलीस अधिक्षक,22 पोलीस उपअधिक्षक, 53 पोलीस निरिक्षिक,263 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 3 हजार 528 पोलीस अंमलदार व 3 हजार 110 होमगार्ड तसेच 07 एसआरपीएफ कंपनी,10 बीडीएस पथके, आरसीपी एक पथक,क्युआरटी तीन पथके,आपत्कालिन परिस्थिती हातळण्यासाठी प्रशिक्षित 16 कार्ट पथके नियुक्त करण्यात आली आहेत.जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने 10 ठिकाणी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाव्दार, महाव्दार घाट,पत्राशेड आदी ठिकाणी 46 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापन करण्यात आली असून यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.सुमारे 352 सीसीटीव्ही कॅमेरॅच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवले जाणार आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण आदी ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहरा बाहेरुन वळविण्यात आली आहे. वाहतुक नियमनासाठी 13 ठिकाणी डायव्हरशन पॉईट सुरु करण्यात आले आहे.त्याचबरोबर खाजगी वाहन धारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर 17 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहाकार्य करावे असे, आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे.











Add Comment